वाठार – कृष्णा-कोयना नदीला नुकत्याच आलेल्या महापुरामुळे रेठरे बुद्रुक ता. कराड येथील नदीवरील पूल तीन दिवस पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी हा पूल शनिवारपासून बंद करण्यात आला. या पुलावरून पादचारीही प्रवास करू शकणार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
कराड पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच कोयना धारणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णा-कोयना नदीला आलेल्या महापुरामध्ये रेठरे बुद्रुक ता. कराड येथील कृष्णा नदीवरील पूल तीन दिवस पाण्याखाली गेला होता. पुराच्या वाहत्या पाण्याच्या दाबामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सन 2006 सालीही पूरपरिस्थिती उद्भवल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता. यावर्षीही दिनांक 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान हा पूल पुराच्या पाण्याखाली होता. रेठरे बुद्रुकमधील शेकडो कुटुंबाना या पुराचा फटका बसला. अनेकांना गाव सोडून जावे लागले. पूर्ण गावात पाणी शिरल्याने येथील लोकांच्या शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपासून महापुराचे पाणी ओसरू लागल्याने पूलाची परिस्थिती समोर येऊ लागली. यामध्ये पुलाचे लोखंडी संरक्षक अँगल तुटून गेल्याचे निदर्शनास आले. पाण्याचा दाब मोठा असल्याने पुलाची आणखी काही दुरावस्था झाली आहे का, पूल वाहतुकीसाठी योग्य आहे का याची पडताळणी करणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू होती. पूर ओसरल्यानंतर लगेच पुलावरून वाहतूक सुरू झाली होती. परंतु बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या आदेशानुसार शरिवार दि. 10 ऑगस्टपासून हा पूल सर्वप्रकारची वहातूक व पादचारी यांच्यासाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरून वाहतूक बंद झाल्यामुळे रेठरेसह परिसरातील सर्व प्रवाशांसमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.