मासेमारी, शेती कामांना सुट ः करोनांचा विळखा होतोय गडद
केडगाव- शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या व्यवसायाला लॉकडाऊनमधून झुकते माप देण्यात आले आहे. सध्या देशभरात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे, परंतु त्यातून शेतीकामांना वगळण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे शेतीशी संबंधित असणारे छोटे – मोठे उद्योग बंद असल्यामुळे शेतीकामांचा खोळंबा होत आहे. त्यातूनही शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
करोना विषाणूंचा विळखा भारतात दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे, परंतु या लॉकडाऊनमधून शेती आणि मासेमारी या व्यवसायांना सुट देण्यात आली आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शासनाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, परंतु शेतीशी संबंधित असणारे अनेक लहान व्यवसाय लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने शेतीकामांची अडचण निर्माण झाली आहे.
शेती या व्यवसायाला जोडधंदा म्हणून मोटार रिवायडिंग शेतीशी संबंधित कुदळ, टिकाव, फावडे, खुरपी आदी साहित्य बनवून देणारे लोहारकाम करणारी दुकाने सद्यस्थितीला बंद आहेत. त्यामुळे विजेच्या कमी जास्त दाबामुळे विहिरीवरील पाण्याचा वीजपंप बिघडला गेल्यास तो कुठं दुरुस्त करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. परंतू ही दुकाने बंद असल्याने पिकांना पाणी देण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत.
- अवजारे मिळणे दुरापास्त-
लोहार उद्योग बंद असल्याने छोटी अवजारे मिळणे दुरापास्त होत आहे. शिवाय सध्या काही पेट्रोलपंप मालक पेट्रोल, डिझेल देताना कमी प्रमाणात देत आहेत. सध्या शेतकरी बांधवांची गहू काढण्याची लगबग सुरू असुन यंत्राद्वारे गव्हाची कापणी करताना डिझेलची समस्या निर्माण होत आहे. गहू, हरभरा, ऊस पिकांच्या कापणीनंतर शेतीची मशागत करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. - शेतीची कामे करताना शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून केली जावीत, असे शासनाने जाहीर केले आहे, परंतु शेती व्यवसायाशी संबंधित छोटे व्यवसाय याबाबत सहानभूतीपूर्वक विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन वीजपंप दुरुस्ती करणारे आणि लोहार व सुतार काम करणाऱ्या लोकांनादेखील उपजीविका करण्याचे साधन उपलब्ध होणार आहे.
-युवराज हंडाळ, शेतकरी, गांढळवाडी.