मुंबई :- आदिवासी विकास विभागातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र आयुक्त नयना गुंडे यांच्या पुढाकारातून वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी व सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेत त्याचा निकालही जाहिर करण्यात आला आहे. यामुळे सव्वा चारशे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयुक्त नयना गुंडे यांच्या आदेशानुसार वर्ग तीनच्या राज्यातील सुमारे नऊशे कर्मचाऱ्यांच्या परीक्षांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. सेवाप्रवेशोत्तर परीक्षेसाठी 756 कर्मचारी पात्र होते. त्यापैकी 73 कर्मचाऱ्यांनी परीक्षेला दांडी मारली. 329 कर्मचारी उत्तीर्ण तर 354 कर्मचारी अनुत्तीर्ण झाले.
अर्हताकारी परीक्षेसाठी 151 कर्मचारी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांनी परीक्षेला गैरहजर होते. 96 कर्मचारी उत्तीर्ण झाले. तर 39 कर्मचारी अनुत्तीर्ण झाले.
दरम्यान, अर्हताकारी परीक्षा न झाल्याने नव्याने सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले होते. त्यांच्या सेवा सातत्य करण्यास विलंब होत होता. आता पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.