सातारा – मुसळधार पावसाळ्यानंतर सातारा शहरातील नागरिक व्हायरल इन्फेक्शनने त्रस्त झाले आहेत. विशेषत: सर्दी, ताप आणि खोकल्याच्या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहेत परिणामी रूग्णालयांमध्ये गर्दी पाहण्यास मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला मुसळधार पाऊस झाला.
त्यानंतर वातावरणामध्ये अचानक बदल होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सद्यस्थितीत सातारा शहरातील जिल्हा रूग्णालयासह मोठ्या रूग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन लगेच होत असते. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार घेतल्यास अशा प्रकारचे आजार टाळते येणे शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे, दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप असल्यास रूग्णांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तात्काळ नजिकच्या रूग्णालयात जावून आवश्यक त्या सर्व चाचण्या वेळीच करून घेतल्यास पुढील धोका टाळता येवू शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.