संगमनेर – शहराच्या जवळून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल खचून सहा महिने झाले. पूल धोकादायक झाल्याने त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. शासन आणि प्रशासनाने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन नागरिकांना किमान दुचाकी घेवून या पुलावरुन जाता येईल इतका सुरक्षित रस्ता तयार करुन द्यावा व लवकरात लवकर मुख्य पुलाचे कामही मार्गी लावावे अशी मागणी आंदोलकर्त्यांनी केली आहे.
शहरातील रंगार गल्लीपासून पुढे गेल्यानंतर म्हाळुंगी नदीचा पूल ओलांडला असता साईनगर, संतोषी माता मंदिर, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे.तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्व परिसराला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला होता.त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या पलिकडे राहणाऱ्या नागरिकांना अकोले नाक्याकडून जावे लागणार असल्याने मोठे अंतर वाढले आहे.
पालिकेत सध्या प्रशासकांचे राज्य असल्याने गेल्या सहा महिन्यात याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आज सकाळी एकत्र येवून पुलासमोरच ठिय्या दिला होता. या आंदोलनाच्या निमित्ताने वस्तुस्थिती सांगताना भाजपचे शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले यांनी भूमिगत गटाराचे काम सुरु असताना आर. एम. कातोरे या ठेकेदाराने पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता सुतावणे यांच्याशी संगनमत करुन मंजूर नकाशा डावलून गटाराचे पाईप पुलाखालून घातले.
त्यासाठी ठेकेदाराने पुलाच्या मधोमध असलेला भराव काढला तर एका माजी पदाधिकाऱ्याने ब्रेकर लावून पुलाच्या पायालाच खाच पाडल्याने हा पूल खचल्याच्या गंभीर आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. हा प्रकार मानवनिर्मित असल्याने गटाराचे काम करणारा ठेकेदार, पालिकेचे बांधकाम अभियंता व ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.