नगर – मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक सुरु आहे. नव्याने आवक झाल्याने हे पाणी गढूळ आहे. त्यादृष्टीने महानगरपालिके -मार्फत विळद जलशुध्दीकरण प्रकल्प व वसंतटेकडी जलकुंभ येथे तुरटी व क्लोरीनची मात्रा वाढवण्यात आलेली आहे. परंतु जलशुध्दीकरण प्रक्रियानंतरही नागरिकाना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, तसेच नळांना तोट्या बसाव्यात असे, आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त मायकलवार यांनी केले आहे.
सध्या पावसाळयाचे दिवस असून या दिवसामध्ये रस्त्यावरुन वाहणारे पाणी नागरिकाचे उघड्या असलेल्या हौदामध्ये जमा होते. होदामध्ये जमा झालेले पाणी तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनद्वारे वितरण व्यवस्थेच्या जलवाहिनीमध्ये जाते व तेच पाणी, पाणी वाटपाच्या वेळी नळ कनेक्शनमधून येते. त्यामुळे पावसाळ्याचे दिवसामध्ये घाण पाण्याच्या तक्रारी वाढत असतात.
तरी नागरिकांनी याची नोंद घेवून त्यांचे नळ कनेक्शनला तोट्या बसवून घ्याव्यात. जेणेकरुन पिण्याचे पाणी वाया जाणार नाही व नागरिकांच्या घाण पाण्याच्या तक्रारीही काही अंशी कमी होतील. तसेच पिण्यासाठी वापरावयाचे पाणी उकळून घ्यावे. त्यामुळे जलज्यन्य आजार होणार नाही. आधीच करोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेवून पाणी उकळून प्यावे व नळांना तोट्या बसाव्यात त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.