पुणे -जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुबु गुबु वाजत, नंदीबैल आला’. मात्र यावेळी कोणा व्यक्तीचे भविष्य विचारले नाही, तर खेड पंचायत समितीची इमारत कधी पूर्ण होणार’, प्रशासनाला कधी जाग येणार.’ सांग भोलानाथ…असे म्हणत शिवसेनेच्या वतीने कार्यालयाच्या गेटवरच जागरण गोंधळ मांडला. नेहमीप्रमाणे हटके पद्धतीने आंदोलन करून शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले.
खेड तालुका पंचायत समितीच्या कामाला चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांनी हा निधी मिळवून दिला. या कामाला मंजुरी मिळाली, भूमिपूजन झाले, कामाची वर्क ऑर्डर निघून सहा महिने झाली. तरीही अद्याप काम सुरू होत नसल्याने शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर यांनी आंदोलन केले.
यावेळी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख माऊली कटके, सुरेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, शलाखा कोंडे, ज्योती झेंडे, रुपाली कड, शैलजा खंडागळे, सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, भगवान पोखरकर, रवींद्र करंजखिले, सुनील बाणखेले, सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, किरण गवारी, विशाल पोटले, बापू थिटे, राहुल मलगे, केशव अरगडे, संतोष अरगडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले. काम लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी खेडच्या आमदारांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचे समजले. सत्य परिस्थिती सांगितल्यावर पालकमंत्र्यांनी आपण एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. आढळराव पाटील म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण होत असेल तर या पुढील काळातही रस्त्यावर उतरावे लागेल.
शिवसेनेचे खासदार, आमदार यांनी खेड पंचायत समितीच्या इमारतीचे मंजूर केलेले काम होऊ द्यायचे नाही, या राजकीय हेतूने विरोध केला जात आहे. सध्या पुण्याची जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे. एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार