सोनम परब
चित्रपटांमधून सामाजिक विषय प्रभावीपणे मांडण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांत वाढला आहे. जे समाजाला जाणवत असते; परंतु त्यावर खुलेपणाने चर्चा होत नाही. असाच एक मुद्दा आहे लैंगिक समानतेचा. या विषयावर वेगवेगळ्या कोनांमधून चित्रपटांमध्ये प्रकाशझोत टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत.
बदलत्या सामाजिक व्यवस्थेचा आरसा म्हणजेच चित्रपट. चित्रपटांच्या कहाण्या आणि पात्रांच्या माध्यमातून अशा सामाजिक विषयांवर नेहमी चर्चा केली जाते, जे समाजाला जाणवत असतात; परंतु त्यावर खुलेपणाने चर्चा होत नाही. असाच एक मुद्दा आहे लैंगिक समानतेचा म्हणजेच जेंडर इक्वॅलिटीचा. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा विषय प्रभावीपणे हाताळण्यात आला आहे.
आम्ही आमच्या मुलीला किंवा पत्नीला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे, असे आजही आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. काहींना आपल्या घरात, काहींना शेजारपाजारात तर काहींना समाजात हा अनुभव येतो.
परंतु नोकरी करायची की नाही, हा निर्णय स्त्रीने स्वतःच घ्यायला नको का? “दिल धडकने दो’ या झोया अख्तर यांच्या चित्रपटातील एका दृश्यात हा मुद्दा प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आला आहे. फरहान अख्तर यांनी रंगविलेले सनी गिल नावाचे पात्र ढोंगी स्त्रीवाद्यांना समजून सांगतो की, स्त्रीवादाचा कोणता मुख्य पैलू त्यांच्याकडून दुर्लक्षित होत आहे. आयेशाचा (प्रियंका चोप्रा) पती मानवला (राहुल बोस) सनी गिल असे सांगतो की, महिलांना काम करण्याची परवानगी द्यायची नसते तर तो महिलेचा स्वतःचा निर्णय असावा लागतो. त्यांना काम करायचे आहे की नाही, याचा निर्णय महिलांनीच घेतला पाहिजे.
निर्णय घेण्याच्या बाबतीत समानता आली तरच महिला आपल्या जबाबदाऱ्या स्वतः पेलतील आणि आपल्या अटींवर आपले जीवन जगू शकतील. इम्तियाज अली यांच्या “जब वुई मेट’ या चित्रपटातील गीत (करिना कपूर) या पात्राच्या माध्यमातून हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. जेव्हा तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न ठरवले जाते, तेव्हा ती घरातून पळून जाते. परंतु तिचा प्रियकर जेव्हा तिला स्वतःसोबत राहण्यास नकार देतो तेव्हा ती स्वतःसाठी नोकरी शोधते आणि स्वतःच्या खर्चाचा भार स्वतः उचलते. ती तिच्या कुटुंबात किंवा प्रियकराकडे परतत नाही, याचे कारण सांगताना ती म्हणते की, माझ्या आयुष्याचे नुकसान केले असा ठपका मी उद्या कुणावरच ठेवू इच्छित नाही. म्हणजेच तिला तिच्या आयुष्याचे जे काही होईल त्याची जबाबदारी स्वतः उचलायची आहे.
एखादी स्त्री तिच्या मर्जीने गृहिणी झालेली असेल; परंतु त्याचा अर्थ तिने घराच्या चार भिंतींत आयुष्यभर कोंडून घ्यावे असा नाही. पुरुषांप्रमाणेच स्त्रीही कोणत्याही क्षणी काही नवीन शिकण्याचा निर्णय घेऊ शकते आणि तिला जे हवे ते मिळवू शकते. याच मध्यवर्ती कल्पनेवर “इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट बेतलेला होता. शशीला म्हणजेच श्रीदेवीला इंग्रजी येत नाही म्हणून तिचा पती सतत तिची खिल्ली उडवत असतो. परंतु खचून न जाता टोमण्यांमधून प्रेरणा घेऊन ती इंग्रजी शिकते, इंग्रजीत भाषण देते आणि मनात आणले तर काहीच अवघड नाही, असे दाखवून देते.
लैंगिक समानता आणि महिलांच्या इच्छेचा सन्मान हा विषय “पिंक’ या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला होता. या चित्रपटात वकील दीपक सहगल यांच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन सांगतात की, समाजाने महिलांसाठी जी नियमावलीची पुस्तिका तयार केली आहे, ती केवळ पुरुषसत्ताक विचारांचा परिपाक आहे. महिलांच्या होकाराचा अर्थ “होय’ असा आहे आणि नकाराचा अर्थ “नाही’ असाच आहे आणि केवळ हेच महत्त्वाचे आहे. या माध्यमातून ते समजून सांगू इच्छितात की, महिलांच्या इच्छेचा सन्मान करणे ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे.
“मर्दानी’ या चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी रॉय या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. महिला कठीण आणि आव्हानात्मक काम करू शकतात, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या पात्राकडून सातत्याने पडद्यावर दिसतो. महिलासुद्धा पुरुषांप्रमाणेच टफ आणि स्ट्रॉंग असतात असे “चक दे इंडिया’मधील महिला संघाचा हॉकी प्रशिक्षक कबीर खानही (शाहरूख खान) सांगतो. हीच गोष्ट “दंगल’ चित्रपटातील महावीर (आमीर खान) सांगतो. हॉकी आणि कुस्ती या दोन्ही खेळांमध्ये चिकाटीने यश मिळविणाऱ्या मुलींची कहाणी या दोन चित्रपटांमध्ये आहे. तात्पर्य, स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक देणाऱ्या आपल्या समाजावर कोरडे ओढण्याचा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून नेहमीच करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हे वास्तव संवादातून किंवा कृतीतून मांडणारी पात्रे लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिली आहेत.
उदाहरणार्थ, “की अँड का’ या चित्रपटातील कबीर (अर्जुन कपूर) लग्नानंतर घर सांभाळायचे ठरवतो. त्याच वेळी किया (करिना कपूर) तिच्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेते. आज खरोखर कुणी असा निर्णय घेतला, तर त्याला समाजात, कुटुंबात काय-काय ऐकून घ्यावे लागेल आणि काय-काय सहन करावे लागेल, याचा अंदाजच करता येत नाही. “छोरीयां छोरों से कम है के?’ असा प्रश्न विचारणारा महावीर (आमीर खान) विसरणे शक्य नाही. महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात आणि मनात आणलं तर गुन्हा करणाऱ्याला अद्दल घडवण्यात त्या मागे पडत नाहीत, हे दाखवून देणारी मर्दानी (राणी मुखर्जी) विस्मृतीत जाणे शक्य नाही.
इंग्रजी शिकण्याची जिद्द पडद्यावर दर्शविणारी शशी कधीच विसरता येणार नाही. समाज चित्रपटांचे अनुकरण करतो, की समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात झळकते, हा विवाद “कोंबडी आधी की अंडे’, या वादासारखाच आहे. परंतु स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात चित्रपटांनी बऱ्याच वेळा टोकदार भाष्य केले आहे आणि ते प्रभावीही ठरले आहे. स्त्रीची सोशिकता, त्याग म्हणजेच तिचे सामर्थ्य असा विचार रूढ करणारे चित्रपटही मोठ्या संख्येने आले आणि ते यशस्वीही ठरले. स्त्रीच्या त्यागाचे आणि सोशिकतेचे उदात्तीकरण करण्यात आले. कुटुंबाचे संगोपन हीच तिची पहिली आणि अंतिम जबाबदारी हे ठसवण्याचा प्रयत्न झाला; परंतु चित्रपटाचे माध्यम या प्रभावातून अंतिमतः बाहेर पडलेच. भविष्यात स्त्री-पुरुष समानतेचा विषय चित्रपटात कोणते वळण घेतो, हेच आता पाहायचे.