नवी दिल्ली – चीनने लडाखच्या वादग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे.
तथापि गेल्या सहा महिन्यापासून तेथील स्थिती नॉर्मल असल्याची पुष्टीही त्यांनी लगोलग जोडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नरवणे म्हणाले की, लडाखच्या पुर्व आणि उत्तर भागात चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केली आहे ती आमच्यासाठी कायमच चिंतेची बाब राहिली आहे. त्यांच्या तेथील हालचालींवर आमचे सततचे लक्ष आहे. त्यांच्याकडून तेथे कोणती आगळीक झालीच तर ते आव्हान स्वीकारण्यास आपले लष्कर सज्ज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
तथापि आमच्यात लडाख सीमावर्ती भागात जे संघर्षाचे केंद्र बिंदु आहेत त्यातील प्रत्येक बिंदुवर सविस्तर चर्चा करून आम्ही त्यावर तोडगा काढू. अशा स्थितीवर चर्चेतूनच मार्ग निघू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि चीन यांच्यातील लष्करी पातळीवरी 13 वी बैठक ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्या बैठकीतूनही चांगले निष्कर्ष निघतील असा विश्वासही लष्कर प्रमुख नरवणे यांनी व्यक्त केला आहे.