पुणे – महाविद्यालये सुरू करण्याबाबत मुख्य सचिव अभ्यास करत आहेत. किती टक्के विद्यार्थी, प्राध्यापक महाविद्यालयात बोलवायचे याची नियमावली बनविणे सुरू आहे, ते येत्या चार ते पाच दिवसांत निश्चित होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरू होतील. याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रबोधन महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उदय सामंत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अजून निर्णय झालेला नसल्याचे सांगत अभ्यास सुरू असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. लसीकरण सुरू झालेले असले तरी अजूनही करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयात येणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचा ताळमेळ घालावा लागेल. ही परिस्थिती जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 31 जानेवारीपर्यंत प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. पण, ती 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल अशी स्थिती आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल, मेमध्ये शिक्षण देऊन परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक आणि अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी विद्यापीठांची असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय अभ्यासक्रमात प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावरील धडा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अध्यासन सुरू करणार असून, शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनावर धडा सामविष्ट करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी “प्रबोधन’च्या शतकोत्सव कार्यक्रमात केली. यावेळी शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख किरळ साळीसह अन्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा संवर्धनाबाबत केंद्र सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.