पुणे – दुचाकी चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन… वाहतूक पोलिसांची कारवाई… दरम्यान वाहनचालकाने मारलेला “कट’… काही क्षणातच दुचाकी आणि रिक्षाची धडक… यामुळे प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला. वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईतून काढलेला पळ या घटनेला कारणीभूत ठरल्याचे रविवारी सकाळी टिळक चौकात पुणेकरांनी अनुभवले.
सिग्नल न पाळणे, हेल्मेट नसणे आदी कारणांमुळे विविध चौकांत नेमलेल्या वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. मात्र, हे वाहनचालक ही कारवाई टाळण्यासाठी गाडी एका बाजूला घेत असल्याचे दाखवत त्या ठिकाणाहून पळ काढतात. मात्र, वाहनचालकांचा याच निष्काळजीपणा दुसऱ्या वाहनाची धडक होवून अपघात घडण्याचे प्रकार अनेकदा शहरात पाहायला मिळतात. पण ही पळवाट स्वत:सह इतरांच्या जीवावरदेखील बेतण्याची शक्यता असते, याचा मात्र नागरिकांना विसर पडत असल्याचे चित्र आहे.
रविवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी रस्त्याकडून टिळक चौक (अलका टॉकीज चौक) जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलला एक दुचाकीचालक थांबला होता. मात्र, संबंधीत वाहनचालकाकडून साईड मिरर, हेल्मेट आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितली. मात्र, या वाहनचालकाने ही कारवाई चुकवण्यासाठी “कट’ मारत गाडी पुढे नेली. परंतु, वाहनचालकाचा गोंधळ उडाला. त्यातच लकडी पुलाकडून येणारा सिग्नल सुटल्याने ही दुचाकी एका रिक्षाला धडकली. यामुळे रिक्षा पलटी होवून, किरकोळ अपघात झाला. यात जीवित हानी झाली नाही.
कारवाईतून पळ काढताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकाचा अपघात घडण्याचा अधिक धोका असतो. सकाळी लकडी पुलाकडून रिक्षादेखील वेगात असती तर, एखाद्याला जीव गमवावा लागला असता, असे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारवाई करताना “कट’ मारणे, ही पळवाट आहे. मात्र, यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडण्याचा धोका असतो.
– पूजा खवले, टिळक चौकातील नियुक्त कर्मचारी, विश्रामबाग वाहतूक विभाग