कोल्हापूर – मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र संभाजीराजेंचं उपोषण मोडण्यात राज्य सरकारला यश आलं असून एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. दरम्यान, संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. “मराठा समाजाच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मंजूर केल्या होत्या. पण मविआचे सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलन करावे लागले. आता ठाकरे सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि संभाजीराजे यांचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला आहे; तर तो क्षणभंगुर आनंद आहे.’ असं ते म्हणाले आहे.
दरम्यान,नबाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर अटकेची कारवाई झाली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असतानाही त्यांचा राजीनामा घेण्यास नकार देणे म्हणजे राज्यातील सरकार दाऊदचे समर्थन करत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.