पुणे – “पुण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन सुनावणीत अडकल्या आहेत. निवडणुकांबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने निर्णय लांबणीवर पडला आहे. न्यायालयाने निकाल दिल्यास महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात,’ असा अंदाज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी वर्तवला.
“निवडणुकांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यावर भाष्य करता येणार नाही. मात्र, दि. 9 मेपासून सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असेल. त्यापूर्वी फैसला झाला, तर महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्येही होतील. निवडणुकांसाठी प्रभाग रचना, मतदार याद्या, हरकती-सूचना असे वेगवेगळे टप्पे असतात. ते पावसाळ्यात पूर्ण होतील. त्यानंतरच निवडणुका होऊ शकतील,’ असे पाटील म्हणाले. त्यामुळे आता प्रत्यक्ष घोषणेकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.
सरकारची हिंमत नाही : काकडे
“सरकारची हिंमत असेल, तर त्यांनी त्वरित निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकार अतिशय चांगले काम करत आहे, असा सरकारचाच दावा आहे. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. पण, निवडणुका घेण्याची हिंमत मात्र त्यांच्यात नाही, हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे’ असे काकडे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.