पुणे- वेताळ टेकडी बचाव समितीच्या वतीने दि.15 एप्रिल रोजी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहेत. यात भाजपसोबत आता ठाकरे गटही सहभागी होणार आहे. पक्षाचे मनपा माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी निवेदनाद्वारे या मोहिमेस पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात सत्तांतरानंतर भाजप आणि ठाकरे गटांत विळा-भोपळ्याचे नाते असताना, या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी वेताळटेकडीसाठी एकत्र येणार आहेत.
महापालिकेकडून वेताळ टेकडीवर सुमारे 350 कोटींचा खर्च करून बालभारती ते पौड फाटा रस्ता करण्यात येणार आहे. याशिवाय पंचवटी ते कोथरूड बोगदाही प्रस्तावित आहे. मात्र, दोन्ही प्रकल्पांमुळे टेकडीवरील जैवविविधतेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा कडाडून विरोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्ष आणि कोथरूडच्या माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या रस्त्यास विरोध केला आहे. दरम्यान, शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधिंनी वेताळ टेकडी वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने केले जात आहे. या सदस्यांनी ठाकरे गट पदाधिकाऱ्यांची भेट घेत जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यानुसार, पक्षाकडून या मोहिमेस पाठिंबा असल्याचे सुतार यांनी कळविले आहे.