मुंबई – राज्यातील अनेक ठिकाणी शनिवार २४ जून पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुण्यात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या पावसात मुंबई तुंबल्याने अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली. यातच आता मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 जून रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मुंबईसह नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडून नंतर जोर कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ६३.६ मिमी, तर सांताक्रूझ येथे २४.६ मिमी पाऊस पडला. सोमवारी दिवसभरात कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या पट्ट्यामध्ये पाऊस होता. गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही सोमवारी सकाळी ७ पासून सायंकाळी ७ पर्यंतच्या २० ते ४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.