पुणे – मॉन्सूनने परतीचा प्रवास (Monsoon Return ) सुरू केल्याचे सोमवारी हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाकडून मंगळवारी संपूर्ण मराठवाडयासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान वीजांच्या गडगडासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार आज मंगळवारी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.
राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनने सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राजस्थानमधील नौखरा, जोधपूर, बारमेर पर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे.
या भागात फ्लॅशफ्लडची शक्यता –
पुणे, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आदी जिल्ह्यांवर 10 – 14 किमी उंचीचे ढग तयार होत आहेत. काही ठिकाणी फ्लॅशफ्लडसारखी स्थिती तयार होऊ शकते. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने गरज नसेल तर प्रवास टाळावा..
तसेच मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी अति जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. फ्लॅशफ्लड सारखी स्थिती तयार होऊ शकते. माळशेजघाट, खंडाळाघाट येथून प्रवास करताना नागरिकांनी सावध राहावे. डोंगरावरून दगड, माती घसरून येण्याची, झाडे पडण्याची शक्यता असल्याची माहिती सतर्क हवामान अभ्यासक संस्थेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.