राहाता – लॉकडाऊनच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला. कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ. विखे पाटील यांनी रविवारी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. आ.विखे पाटील यांनी मार्केटमध्ये आलेल्या कांदा पिकाची आवर्जुन पाहाणी करुन मिळत असलेल्या भावाबाबतही त्यांनी जाणून घेतली.
आ. विखे पाटील म्हणाले की, करोना संकटामुळे संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहीला.
म्हणुन शेती उत्पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. शासनाच्या पणन विभागाची निष्क्रीयता याला कारणीभूत ठरली असा थेट आरोप करुन ते म्हणाले, शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या एकाही व्यवस्थेने शेतकऱ्यांचा उत्पादीत माल खरेदी करण्याची इच्छाशक्ती दाखविली नाही. शासनाने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्या पणन विभागाला याचे महत्व समजले नाही.
राज्यातील बाजार समित्या नियोजनपुर्व सुरु ठेवल्या असत्या तर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली असती. सध्या उपलब्ध असलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही, कांदा उत्पादकांनीही उत्पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्यामुळे भविष्यात भाजीपाल्या बरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. यावेळी बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, बाळासाहेब जपे, अशोकराव जमधडे, शरद मते, दिलीप रोहोम, सचिव उद्धव देवकर आदि उपस्थित होते.