पुणे – महाराष्ट्रातील आघाडीचा सराफी ब्रँड असलेल्या व फॉर्च्युन ५०० इंडिया २०२१च्या यादीत समाविष्ट असलेल्या पीएनजी सन्सला (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)चा ३६सावा जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारा पीएनजी सन्स हा महाराष्ट्रातील पहिलाच सराफी ब्रँड ठरला आहे. मुंबईत झालेल्या सोहळ्यात पीएनजी सन्सचे संस्थापक – अध्यक्ष अजित गाडगीळ व कंपनीचे संचालक – सीईओ अमित मोडक यांनी हा पुरस्कार उद्योजक शेखर बजाज व ब्रीज कँडीचे डॉ. हेमंत ठाकर यांच्या हस्ते स्वीकारला.
पारदर्शी व्यापारवृद्धीसाठी जे. आर. डी. टाटा, रामकृष्ण बजाज यांच्यासह अन्य उद्योजक व व्यावसायिकांनी मिळून सीएफबीपीची स्थापना केली. ग्राहक सेवा-समाधान, सीएसआर, पर्यावरण, वित्त-लेखा, नियम, कर्मचारी यांच्यासह एकूण नऊ निकषांची तपासणी सीएफबीपीने केली. तसेच, त्यावरील सादरीकरण, मुलाखत आदींचा यात समावेश होता. देशभरातून विविध कंपन्यांनी सीएफबीपीच्या पुरस्कारासाठी नामांकन भरले होते. त्यात पीएनजी सन्सला मोठ्या कंपन्यांच्या श्रेणीत स्थान मिळाले.
पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, “या पुरस्कारामुळे आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्याचा आनंद आहे. गेल्या सहा पिढ्यांपासून आम्ही सराफी व्यवसाय करताना ग्राहकांना उत्तम सेवा, पारदर्शिता, गुणवत्ता देत आहोत. तसेच, पुरस्कारामुळे आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.”
“व्यवसाय विस्तार करताना पीएनजी सन्सने कायम गुणवत्ता व पारदर्शितेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आमची सर्व दालने कंपनी संचालित व मालकीची असून, एकही फ्रँचायझी नाही. ग्राहकांच्या प्रेमामुळेच पीएनजी सन्सने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल पार केली आणि पु. ना. गाडगीळ कुटुंबातील अशी कामगिरी करणारी पीएनजी सन्स पहिलीच कंपनी आहे. तीन राज्य, २३ शहरांतून ३० दालने आहेत,” असे कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.