नवी दिल्ली – केंद्र सरकारचा सप्टेंबर महिन्यामध्ये जेईई आणि नीट परीक्षा घेण्याचा निर्णय २५ लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणारा आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच केंद्रातर्फे जेईई आणि नीट परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल न करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.
पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी, “सध्या देशातील अनेक राज्य संपूर्ण ताकदीनिशी कोरोना संकटाचा सामना करत आहेत. अशातच परीक्षा घेतल्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढणार असून हा निर्णय अनेकांचे जीव धोक्यात घालणारा आहे.” असा दावा केला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातर्फे केंद्राच्या जेईई आणि नीट परीक्षा घेण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र व पश्चिम बंगालसह इतर सहा राज्यांनी केली आहे.
तत्पूर्वी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, ‘केंद्राने विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय घेताना त्यांना विचारात घ्यावे,’ असा सल्ला दिला होता.