नेवासा – यंदाच्या गळीत हंगामात देशात 60 लाख टन तर महाराष्ट्रात 140 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. नवीन हंगाम सुरु होताना देशात 60 लाख टन व महाराष्ट्रात 30 लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. म्हणून कारखान्यांचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी आणि स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच निर्यात खुली करण्याचा निर्णय घ्यावा, किमान 100 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली.
मुळा कारखान्याच्या सोमवारी झालेल्या 45 व्या गळीत हंगामा निमित्त आयोजित पूजाविधी कार्यक्रमात आ. गडाख बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख प्रमुख पाहुणे होते. आ. गडाख म्हणाले की, शासनाने इथेनॉलचे पूर्वी जे दर ठरवून दिले आहेत. त्यानंतर ऊसाच्या एफआरपीत केंद्र सरकारने वाढ केली. त्या प्रमाणात इथेनॉलच्या दरातही वाढ करण्याची गरज आहे. तसेच साखरेच्या विक्रीची किमान आधार किंमत 3100 वरून 3600 रुपये करण्याची कारखानदारीची मागणी अद्याप मान्य झाली नाही. त्यामुळे साखर कारखानदारीला तोटा सहन करावे लागत आहे.
त्यातून एफआरपी देण्यास अडचणी येते. उपपदार्थ असले तरी साखर युनिटमध्ये झालेला तोटा भरून निघू शकत नाही. ऊसाच्या धर्तीवरच शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुधाचे दरही निश्चित करण्याची गरज आहे. ऊस, साखर आणि दुधाचे दर चांगले मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही असे ते म्हणाले.
मागच्या हंगामात गळीत ऊस तोडणीसाठी काही ठिकाणी लेबरने पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या. तो अनुभव जमेला धरून यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुकादम आणि हार्वेस्टर मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांकडे पैसे मागू नयेत, अशा सक्तसूचना त्यांना दिल्या आहेत. असे सांगून आ. गडाख म्हणाले, पाऊस झाला नाही तर पंधरा तारखेपासूनच गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन असून यंदा एप्रिल महिन्या अखेरीस सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. रोज किमान सरासरी 8500 टन गळीत करून साखर उतारा वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील.
कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी केले. आभार उपाध्यक्ष कडुबाळ पा.कर्डिले यांनी मानले तर कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विश्वास गडाख, जबाजी पाटील फाटके, नाथा घुले, नंदकुमार पाटील, लक्ष्मणराव जगताप, नानासाहेब रेपाळे, सुरेश पा.गडाख, मदनराव डोळे, प्रा.गणपतराव चव्हाण, सिताराम पा.झीने, भाऊसाहेब लांडे, रावसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, भगीरथ पाटील जाधव आदी उपस्थित होते.
संधीचे सोने करूः कुलगुरू गडाख
मुळा कारखान्याने केलेला सत्कार हा घरचा सत्कार आहे. कारण मीही सभासद आहे. हा सत्कार म्हणजे मला मिळालेली ऊर्जा असून ती मला भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि ऊर्जेच्या बळावरच कुलगुरूपदाचे मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करील, असे उद्गार कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी काढले.