कर्जत – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने शेजारील देशांना साखर निर्यात करण्याच्या धोरणाला परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव देता येईल, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अंबालिका शुगर (ता.कर्जत) येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दौंड शुगरचे वीरधवल जगदाळे, तालुकाध्यक्ष काका तापकीर, माजी सदस्य राजेंद्र गुंड, युवक अध्यक्ष नितीन धांडे, संचालक विश्वजित भोसले, विजय मोढळे, श्याम कानगुडे, शहाजीराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे, जनरल मॅनेजर सुरेश शिंदे उपस्थित होते. एकरी शंभर टन उत्पादन कसे काढावे, या विषयावर शेतीतज्ज्ञ सुरेश कबाडे यांनी मार्गदर्शन केले. व्हीएसआयचे शास्त्रज्ञ पी.पी.शिंदे व एस.एस.कटके यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, ऊस बेणे व खोडवा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशनचे अभय जैन यांनी ठिबक सिंचनामधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली.