नवी दिल्ली- दारू माफियाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका पत्रकाराचा काल संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगींना एक पत्र पाठवून केली आहे. दारू माफिया आणि प्रशासनाचे जे लागेबांधे सुरू आहेत त्याचीही चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुलभ श्रीवास्तव असे या पत्रकाराचे नाव आहे. त्यांचा 13 जूनच्या रात्री अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. श्रीवास्तव यांना धमक्या येत होत्या, त्यांनी पोलिसांकडे संरक्षणही मागितले होते ही बाबही मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिली आहे. श्रीवास्तव यांनी दिलेल्या बातम्यांमुळे संबंधित दारू माफियांचे माथे फिरले होते त्यांच्यापासून श्रीवास्तव व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होता.
पण ही बाब पोलिसांकडून दुर्लक्षित झाली होती. त्यामुळे या साऱ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली गेली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. याच दारू माफियाने विषारी दारूची विक्री केल्याने अलिगडपासून प्रतापगडपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे असेही प्रियांकांनी त्यांच्या निदर्शनाला आणले आहे.
उत्तरप्रदेशातील माफिया राजवर पोलिसांचे आता नियंत्रण राहिलेले नाही हेच अशा घटनांमधून दिसून येत असल्याचेही प्रियांकांनी म्हटले आहे. कालच या घटनेचा उल्लेॅख करून उत्तरप्रदेशात जंगल राज सुरू असल्याची टीका प्रियांकांनी केली आहे.