मुंबई – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम साडेतीन हजार रुपये, तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम 3 हजार रुपये देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
मलिक म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ज्यू व पारशी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे असलेल्या शहरांमध्ये राहण्याची सुविधा झाली आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना भोजन व इतर खर्च करणे शक्य होत नाही.
त्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता आता त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.