मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची अटक आणि त्यांचा कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमशी संबंध जोडले गेले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येत असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. राणे यांच्या या आरोपानंतर आता आमदार नितेश राणे यांच्याकडून देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार, “मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का ? मग नवाब मलिक कोण आहेत. नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली ईडीने मलिक यांची आठ तास चौकशी करुन त्यांना अटक केले होते. तर ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.
या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली असून न्यायालय येत्या १५ मार्च रोजी आपला निकाल देणार आहे. तर मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली असून विरोधक मलिक यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेले आहेत.