लखनौ – रामचरितमानस या पवित्र ग्रंथाच्या पानांच्या फोटोकॉपी जाळल्याप्रकरणी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह दहा जणांवर पीजीआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी 5 जणांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मौर्य यांच्याशिवाय महेंद्र प्रताप यादव, देवेंद्र यादव, यशपाल सिंह लोधी, एसएस यादव, सुजित, नरेश सिंग, सलीम आणि संतोष वर्मा यांची नावे एफआयआरमध्ये आहेत.
रामचरितमानसच्या प्रती फाडल्या आणि जाळल्याप्रकरणी भाजप नेते सतनाम सिंह लवी यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट रचणे, वातावरण बिघडवणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचरितमानस वादात स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याआधीही त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
स्वामी प्रसाद मौर्या यांनी एका टीव्ही चॅनलशी केलेल्या संभाषणात रामचरित मानसच्या काही भागांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा मुद्दा तापला आहे. मौर्य म्हणतात की या मजकुरातील अनेक भाग दलित, आदिवासी आणि महिलांवरील अत्याचाराचे समर्थन करतात. हे भाग या पुस्तकातून काढले पाहिजेत.