21व्या शतकात सिमेंटच्या जंगलात रमू पहाणारा माणूस पूर्वीच्या काळी गूहेत रहात होता. हळूहळू त्याच्यात प्रगती होत तो पुढे जंगलातील झाडांचा उपयोग करून खोपट्यात राहू लागला. कालांतराने झाडांच्या फाद्यांचा, लाकूडफाटा तोडून संपूर्ण लाकडांपासून घर तयार करण्यास सुरूवात केली. यातूनच पुढे सुतार व्यवसायाचा उदय झाला असावा, असे जाणकार सांगतात. जसजसा हा सुतार आपली कला व कसब पणाला लावून लाकडाला हवा तसा आकार देऊन दैनंदिन वापराच्या वस्तू ग्राहकांना अत्यल्प दराने देऊ लागला. तसे सुतार कलेचे महत्व वाढले. बारीक सारीक कला कुसरीची कामे हातोहात होऊन अप्रतिम अशी घरे, वाडे, राजवाडेही सुतारांच्या कलेने नाव्हून निघाले आहेत.
मात्र, आधूनिक यूगात व बदलत्या काळात दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच लाकडी दारे-खिडक्या लाकडाच्या वापराऐवजी लोखंड, स्टील व पत्र्याच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्याने लाकडी वस्तूची मागणी कमी झाली आहे. लाकडी वस्तूंची होणारी झीज, लागणारी वाळवी, कीड, कूजणे या सर्वांचा विचार करून लोक लोकंडी वस्तूकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे पूर्वीपासून चालत आलेला सुतार व्यवसाय अडचणीत आल्याने कारागीर आर्थिक संकटात सापडला आहे.
आधुनिकतेचा स्विकार करताना हल्लीच्या मानवाने बदलत्या काळानूसार घरे बांधण्यासाठी आज लाकडी साहित्याऐवजी लोखंड, स्टीलचा वापर करू लागला. मजबूत व टिकाऊ घर बांधण्यासाठी माणसाने लोखंड व पत्र्याचा वापर करण्यास सुरूवात केली. याशिवाय घरा घरातील वस्तूही लोखंडाच्या दिसून येत आहेत. घराचे वासे-बडूदं, दारे-खिडक्या लाकडाच्या बनवण्याऐवजी लोखंडाच्या बनू लागल्या आहेत. खरीप व रब्बी पेरणी अगोदर शेतकरी आपली अवजारे सुतारांकडून नवीन बनवून घेत होता किंवा दूरूस्त करत होता. पण शेतीची सर्वच कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागल्याने सुतारांच्या हाताला कामच उरले नाही. परिणामी सुतार व्यवसायाला घरघर लागली आहे.
ट्रॅक्टरने पेरणी, कूळवणीसह शेतीची सर्व कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागल्याने बळीराजा वापरत असलेली सर्वच लाकडी अवजारे इतिहास जमा होऊ लागली आहेत. याशिवाय अगदी घराघरात दिसणाऱ्या लाकडी वस्तूही गायब झाल्या आहेत. त्यांची जागा लोखंड व स्टीलच्या वस्तूंनी घेतली आहे. त्यामुळे कुंभार जसा मातीला आकार देऊन वस्तू बनवतो, तसा लाकडाला हवा तसा आकार देऊन मागेल ती वस्तू बनवून देणाऱ्या सुतार व्यवसायासह सुतार कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी सुतार कला अवगत असतानाही या व्यवसायातील कारागींरांना मिळेल, तो रोजगार करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.
– आनंदराव देसाई
लाकडापासून दारे, खिडक्या, दरवाजे, टेबल,खूर्च्या, कपाटे, पाट, चौरंग, शेतीची विविध अवजारे तयार करून विकणे. लाकडी खेळणी व गरजेच्या वस्तू तयार करून जनतेच्या गरजा भागवण्याचे काम आम्ही पिढ्या अन् पिढ्या करत आलो आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर व शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या धान्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह आम्ही करत होतो. पण लोखंडच्या जमान्यात आमचा व्यवसाय जवळपास बंदच पडला आहे. त्यामुळे रोजगार केल्याशिवाय गत्यंतर नाही.
रामचंद्र सुतार, चाफळ.