नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळामध्ये बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कामकाजात आमूलाग्र बदल केले आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा घरपोच देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न चालू आहे. आता काही कार कंपन्या वाहनांचे सुटे भाग ग्राहकांना घरपोच देण्याची यंत्रणा विकसित करीत आहेत.
टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीने कारचे बरेच सुटे भाग घरपोच देण्याची यंत्रणा विकसित केली आहे. सध्या 12 शहरातील ग्राहकांना कारचे सुटे भाग घरपोच मिळतात. लवकरच ही यंत्रणा राष्ट्रीय पातळीवर राबविण्याचा कंपनीचा विचार आहे.
सध्या 12 शहरात या सेवा ग्राहकांना घरपोच मिळतात. त्यामध्ये कारची देखभाल करणारी उपकरणे, इंजिन ऑइल, टायर, बॅटरी इत्यादीचा समावेश आहे. एकतर यामुळे ग्राहकांना खरे सुटे भाग मिळतात. त्याचबरोबर ग्राहकांचा वेळ वाया जात नाही. त्यामुळे आम्ही ही व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष नवनीत सोनी यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्राहकांना बराच त्रास झाला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही ही यंत्रणा विकसित केली आहे.
मर्सिडीज बेंझसारख्या कंपन्यांनी आता आपली उत्पादने ग्राहकांना कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे योग्य किमतीवर ग्राहकांना कंपनीच्या कार मिळतील असे सांगितले जाते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून इतरही कार कंपन्या अशा प्रकारच्या ग्राहकांशी थेट संबंध असलेल्या यंत्रणा विकसित करण्याची शक्यता आहे.