पुणे – पोलीस भरती प्रक्रियेच्या विरोधात आता उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापरीक्षा पोर्टलमधून पोलीस भरती वेगळी करावी व पूर्वीप्रमाणे लेखी स्वरूपात घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. अन्यथा येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उमेदवारांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
प्रशांत निकम, गणेश खंदारे, कैलास भिससह आदी उमेदवारांनी पोलीस भरतीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी भरतीसाठी लेखी परीक्षा होत होती. यंदा मात्र ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन घेण्यात येत आहे, त्यास विरोध आहे. पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षाद्वारे ही भरती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी अगोदर शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात होती. त्यानंतर लेखी परीक्षा होत होती. आता मात्र प्रथम परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया चुकीची आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणे आवश्यक आहे. तसेच, पोलीस भरती 3,400 पदांसाठी होत आहे. त्या पदांच्या संख्येत वाढ व्हावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. राज्य शासनाने या मागण्या मान्य न केल्यास उमेदवार अर्धनग्न मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात काढून निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असे उमेदवारांनी सांगितले.