रेडा – व्यावसायिक छायाचित्रकारांची उत्पन्नाची खरी मदार ही लग्नसराईच्या काळातच असते, यात लग्नसराईच्या काळात कोट्यवधींची उलाढाल छायाचित्रकारांची होत असते. ग्रामीण भागात फोटोग्राफी हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबांना आधार देणारा ठरत असतानाच, लॉकडाऊनमुळे ना लग्न, ना कार्यक्रम, यामुळे छायाचित्रकारांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे कॅमेरा आऊट ऑफ फोकस अशी गत झाल्याचे विदारक चित्र सध्या निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 140 गावांची हद्द आहे. यामध्ये फोटोग्राफी व्यवसाय करणारे किमान तीन गावात दोन व्यवसायिक आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यावसाय अत्यंत अडचणीत सापडला आहे. हा व्यावसाय सद्यस्थितीला डबघाईला आलेला आहे. लग्न समारंभ उद्घाटन व सातत्याने होणारे प्रशासकीय कार्यक्रम, सध्या गर्दी होत असल्याने बंद आहेत. छायाचित्रकार म्हणून व्यवसाय करणारे हवालदिल झालेले आहेत.
दुसरीकडे स्मार्ट फोन व लॅपटॉप डिजीटल काळात पासपोर्ट छोटे-मोठे फोटो हे खऱ्या अर्थाने कॅमेऱ्याचा वापर करून काढले जातात. इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर, भिगवण, वालचंदनगर, निमगाव-केतकी, निरा नरसिंहपूर, भांडगाव तसेच ग्रामीण भागात फोटोग्राफी व्यवसाय करणारे असंख्य युवक आहेत. यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तसे पाहिले तर फोटोग्राफी हा व्यवसाय जीवघेणा आहे त्यामुळे नवीन अद्यावत टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दरवर्षी नवीन साहित्य या फोटोग्राफी छायाचित्रकाराला खरेदी करावे लागते. ज्यांनी असे नवीन अद्ययावत कॅमेरे व इतर साहित्य ड्रोन खरेदी केले आहेत, त्यांना मात्र कर्जाचा बोजा कसा फेडायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
तरच छायाचित्रकार टिकून राहतील
यंदा जून पुढील येणारे विवाह मुहूर्त काळात लग्न सोहळे होतील, की नाही, जरी इथून पुढील काळात लग्नसोहळे करण्यास परवानगी दिली तरी, किती लोकांना या लग्नात उपस्थित राहण्याचा दंडक घातला जाणार, यावर देखील छायाचित्रकारांचे अस्तित्व ठरणार आहे. अशा परिस्थितीत छायाचित्रकाराची गत काय होणार असा प्रश्न चिंतेचा होऊन बसला आहे. खरेतर छायाचित्रकारांना शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले तरच हे छायाचित्रकार टिकून राहतील, असे चित्र आहे.
उदरनिर्वाह कसा करायचा
लग्नसराई ही त्यांच्या वर्षभर उपजीविकेचे साधन बनलेले असते, ही लग्नसराई संचारबंदीमध्ये थंड असल्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत छायाचित्रकार अडकले आहेत. कर्जाचा बोजा कसा फेडायचा याची मोठी चिंता पडली आहे.छायाचित्रकारांच्या उमेदीचा काळ हा प्रामुख्याने लग्नसराईशी निगडित आहे. याच बरोबर गावाकडे होणारे छोटे-मोठे कार्यक्रम देखील स्तब्ध असल्यामुळे, या छायाचित्रकारांच्या हाताला काम नाही.