सुन्न डोक्याने विठोबा रखुमाई समोरासमोर बसले होते. बाहेर अंधार पडत होता. दापोली तालुक्यातील मुरुडचे विठोवा रखुमाई. एक मुलगा, एक मुलगी. मुलगी लग्न होऊन देवगडात तर मुलगा नोकरीनिमित्त मुंबईत. वादळाने त्यांचे होत्याचे नव्हते होऊन गेले. वय म्हणाल तर, विठोबा पासष्ट व रखुमाई साठ. विठोबा निवृत्त शिक्षक. रोज परसातील आंबे, नारळ, पोफळी, फणस यांची देखभाल करत. रखुमाईला तर घरकामाची आवड. नियमित घर सारवून घेणे. घराची देखभाल व सायंकाळी भजन ही त्यांची दिनचर्या.
मोठे वादळ होणार याची आगाऊ सूचना मिळाली होती. मुलानेही मुंबईतून फोन केला होता. कारण तो महापालिका रुग्णालयात कामाला, त्यामुळे सुट्टी नाही. त्याने शेजारच्यालाही सांगून ठेवले होते. प्रत्येकाची थोडीफार वाडी होती. विठोबालाही नारळ, पोफळीचे उत्पन्न मिळे. वर पेन्शन होतीच.
वर्षानुवर्षे केलेली मेहनत क्षणांत शून्य झाली. सोसाट्याचे वारे सुरू होताच विठोबाने घर बंद करून घेतले. खिडकीतून तो बाहेर पाहू लागला. त्याला वाटले थोड्या वेळात हे थांबेल. पण यावेळी वादळाचा वेग प्रचंड होता. क्षणात लोकांचे पत्रे, कौले उडाली. झाडे जोरजोराने हलू लागली. मोठ्या चक्रवातापुढे कुणाचेच चालेना. झाडे पडायला लागली. दोन तास वादळाने थैमान घातले. नंतरचे चित्र अत्यंत विदारक होते. ते पाहून विठोबा रखुमाई अक्षरश: रडू लागले.
डोळ्यांदेखत आंबे, पोफळीची झाडे उन्मळून पडली. नारळ, फणस कशाकशाची नावे घ्यावी. सर्वत्र मोडक्या झाडांचा खच पडला होता. वीज तर पुन्हा येणे केवळ अशक्यच. कारण सर्वच तालुक्यात विजेते खांब व त्यावरील ट्रान्सफॉर्मरही उन्मळून पडले होते. विठोबाच्या घरावरीलही अर्ध्याधिक कौले उडून गेली. घरात पावसाचे पाणी व कचरा आला होता. परसातील बावेपर्यंत जाण्यासाठीची सोय नाही, एवढी सर्वत्र पडझड झाली. दोघांनी कसे बसे घरातील पाणी बाहेर काढले.
चार दिवसांनी स्वागताचे बोर्ड लावलेले नेते धावपळीचा दौरा करून गेले. काही अर्ज ग्रामपंचायत सदस्यांना वाटले. त्यातील एक अर्ज कुणीतरी विठोबाकडे घेऊन आला. नंतर अर्जावर सही घेऊन गेला. मुलाशी फोनवर बोलणे झाले, पण तोही येऊ शकत नव्हता. करोनामुळे गावात शाळेमध्ये चाकरमान्यांसाठी चौदा दिवस राहण्याची व्यवस्था केली होती. तेथे पंचायतीतर्फे जेवण दिले जात होते. सुदैवाने शाळा वा पंचायतीच्या इमारतीस काही झाले नव्हते.
घर स्वच्छ केले, पण परसात काम करायची हिंमतच होईना. काय काम करायचे, कुठून सुरू करायचे, कसे करायचे आणि किती करायचे हे सारे प्रश्न सतत भंडावत होते. शेजारच्या दिनकरने दोन माणसे घेऊन घर ते बावेपर्यंतचा परिसर थोडा साफ करून दिला. जेणेकरून बावडीतील पाणी काढता येईल. विठोबा रखुमाई दोघेही हतबल झाले होते.
अत्यंत मेहनतीने लावलेले कलमी आंबे, रातांबे, पोफळी क्षणात जमीनदोस्त झाल्या. अजूनही ते दोघे त्या घराबाहेर पडू शकत नव्हते. मनातल्या मनात पूर्णपणे खचले होते. एवढ्यात दिनकरने “मास्तर’ अशी जोराने हाक मारली व म्हणाला, “आम्ही जेवण घेऊन शाळेकडे निघालो आहोत’. चाकरमान्यांसाठी शाळेत जेवणाची सोय होती. अत्यंत जड पावलांनी बॅटरीच्या उजेडात विठोबा रखुमाई दोघं सांजच्या जेवणासाठी शाळेकडे निघाले.
– उत्तम पिंगळे