नगर -सावेडी उपनगरातील कचरा डेपोस बुरुडगांव येथे स्थलांतरीत करण्याचा मनपा महासभेत विषय असून, या स्थलांतरानास नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अरुण शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, हरित लवादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बुरुडगांव कचरा डेपो येथे 100 टनी कचरा प्रकल्प चालू झाला असून, नव्याने सावेडी येथील 50 टन कचरा प्रकल्प सावेडी येथेच उभारण्याचे आदेश लवादाने दिलेला आहे.
सावेडी कचरा प्रकल्पासाठी मनपा मार्फत आजपर्यंत अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी (रस्ते, कंपौड, शेड) खर्च केलेला असून, तो खर्च व्यर्थ जाणार आहे. तसेच सावेडी ते बुरुडगांव हे अंतर 10 कि.मी. असून, तेथील कचरा वाहतुकीचा खर्च अवाढव्य असून, तो भार नागरिकांवर पडणार आहे. तसेच मनपा झाल्यानंतर शहराच्या चारही झोनमध्ये कचरा डेपो, अमरधाम, विविध कामांसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत, मोठ्या शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट त्या-त्या विभागातच लावली जाते.
आज शहरामध्ये कुठेही कचरा कुंडी ठेवण्यास विरोध होत असतांना बुरुडगांवला ग्रामस्थ मात्र, मनपाचा कचऱ्यापासून त्रस्त आहेत. प्रदुषणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आले आहे. बुरुडगांव साथीच्या रोगांना बळी पडत आहे. तसेच आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पास स्थलांतरास बुरुडगांवकरांचा तीव्र विरोध असून, हा विषय महासभेतूनच वगळावा, अन्यथा बुरुडगांवकर तीव्र आंदोलन हाती घेतील, असेही निवेदनात म्हटले आहे.