मुंबई- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानेच बुलेट ट्रेन यावी, असा प्रकल्प अहवाल आम्ही तयार करीत असून या महिन्याचा शेवट किंवा मार्च महिन्यात हा प्रकल्प अहवाल आमच्याकडे, येईल अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपुरात दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशात आता यापुढे जे बुलेट ट्रेन येतील किंवा बुलेट ट्रेन संदर्भात प्रकल्प तयार केले जातील ते सर्व एलिव्हेटेड वर आधारीत असतील असे त्यांनी सांगितले, त्यामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही आणि सरकारचा त्या प्रकल्पावर खर्चही कमी होईल असेही त्यांनी सांगितले.
देशातील सर्व रेल्वे गाड्यांमधून पाकिटबंद खाद्यपदार्थ बंद करणार असून त्याजागी आता शिजलेले अन्न आम्ही सुरू करणार असल्याचेही यावेळी रावसाहेब दानवे यांनी सांगितले. भाजप नेत्यांचा घरासमोर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केले जाणाऱ्या आंदोलनासंदर्भात विचारले असता कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व संपले असून आमचे अस्तित्व अजून आहे, हे दाखविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आंदोलन करीत असल्याची टीकाही यावेळी दानवे यांनी केली आहे.