वाराणसी इथे विविध प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्धघाटन
वाराणसी – केवळ सरकारमुळे नाही तर देशाची संस्कृती आणि नितीमुल्यांमुळे देशाची उभारणी होते असे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले आहे. ते आज उत्तरप्रदेशात वाराणसीतल्या जंगम बडी मठात श्री जगद्गुंरु विश्वराध्य गुरुकुलाच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. नागरिक म्हणून आपली वागणूक कशी आहे, यावरच देशाच्या भवितव्याची दिशा ठरेल असे ते म्हणाले.
मोदींनी सर्वप्रथम जंगम बडी मठात जाऊन प्रार्थना केली. यावेळी मोदी यांच्या हस्ते श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथाच्या 19 भाषांमधल्या अनुवादाचे आणि मोबाईल ऍपचे प्रकाशन झाले.
त्यानंतर नरेंद्र मोदी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती केंद्राचे लोकार्पण केले. या कार्यक्रमात पंतप्रधान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 63 फूट उंचीच्या पंचलोह पुतळ्याचे अनावरण केले. एखाद्या नेत्याचा देशातला हा सर्वात मोठा पुतळा आहे. हा पुतळा पूर्ण करण्यासाठी गेले वर्षभर 200हून अधिक कारागीर दिवस-रात्र काम करत होते. या स्मृती केंद्रात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित कोरिव काम देखील पाहायला मिळेल. या प्रकल्पावर गेले वर्षभर ओडिशातले सुमारे 30 कारागीर काम करत होते.
त्यानंतर पंतप्रधानांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात 30हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय (व्हीएचयू) येथील 430 खाटांचे अतिविशेष सरकारी रुग्णालय आणि 74 खाटांचे मनोरुग्णालयाचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून “आयआरसीटीसी’च्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे गाडी वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. रात्रीचा प्रवास करणारी देशातील ही पहिली खासगी रेल्वे असेल. पंतप्रधानांनी “काशी एक रुप अनेक’ चे उद्घाटनही केले. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह जगाच्या विविध देशांमधून आलेल्या ग्राहक आणि कारागिरांशी पंतप्रधान संवाद साधला.