पुनर्वसित गावांचा चेहरामोहरा बदलण्यास सुरूवात
रेडा – इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त गावातील पुनर्वसित गावाच्या रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी शासनाने भरघोस निधी देणे गरजेचे आहे. याच पुनर्वसित भागातील रस्ते परिपक्व करणे गरजेचे आहे. आजोती, पिंपरी खुर्द भागातील रस्त्यांसाठी तात्काळ निधी द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
उजनी धरणग्रस्तांच्या अनेक समस्या शासन दरबारी आहेत. मात्र, शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेले आहे. पुनर्वसित गावामध्ये आजोती, पिंपरी खुर्द, सुगाव, शिरसोडी,पडस्थळ, माळवाडी नं एक-दोन, नंबर 2 कालठण, तरडगाव ते भिगवण शहरापर्यंत असणारी सर्व लहान-मोठी गावे बॅक वॉटर पट्ट्यातील आहेत. या सर्व गावांच्या हद्दीत पानंद रस्ते नाहीत. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीपर्यंत गावापासून जाणारा रस्ता दर्जेदार असावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याच परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते नसल्यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहेत. यासंदर्भात आमदार भरणे यांच्याकडे या भागाचा विकास व्हावा, यासाठी पाठपुरावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार, किसनराव जावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष डॉ. भारत जगताप, सचिन चव्हाण, रमेश पाटील, प्रफुल्ल पवार, सुनील मोहिते, नानासाहेब नरोटे, पिंटू शिंदे, पोपट शिंदे, सर्जेराव रेडके, बाळासाहेब व्यवहारे, गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.
याच पुनर्वसित गावांच्या विकासासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी आमदार भरणे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये मंजूर केला होता. या मंजूर निधीतील कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, याच भागातील पानंद रस्ते होणे गरजेचे आहे. वाड्या-वस्त्या जाणाऱ्या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मिळाला पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पिंपरी खुर्द भागातील दोन रस्ते पाण्याखाली –
इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द भागातील दोन रस्ते पुनर्वसित गावाच्या हद्दीतील परतीच्या पावसाने पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागातील वाड्या वस्त्यावरील नागरिकांना अडचणीचे ठरले आहे. यामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींना देखील अखेरचा विधी करण्यासाठी त्रास झालेला आहे. यामध्ये आजोती ते पिंपरी रस्त्यावर अद्याप पाणी आहे. पेटकर वस्ती, व्यवहारे वस्ती रस्त्यावर पाणी आहे. या दोन रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
25 वर्षांतून पहिल्यांदा मोठा निधी –
उजनी धरणग्रस्त पुनर्वसित गावांच्या विकासासाठी आमदार भरणे यांनी पहिल्यांदाच सहा कोटीच्या आसपास निधी खेचून आणला आहे. मात्र, मागील पंचवीस वर्षांत या भागाला कोणताही निधी मिळाला नव्हता. त्यामुळे इतक्या वर्षातून हा निधी आमदार भरणे यांनी आणल्यामुळे बहुतेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भरणे यांना या भागाने मोलाची साथ दिल्यामुळेच पुन्हा आमदार म्हणून भरणे यांना विराजमान होता आले आहे.
सहा रस्त्यांसाठी मागवला निधी –
उजनी धरणग्रस्त गावातील पुनर्वसित भागाचा विकास करण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी तब्बल सहा रस्त्यांसाठी निधीची मागणी उजनी कालवा विभागाकडे लेखी पत्राने केली आहे. यामध्ये कालठण नं 1 ते कळाशी पोहोच रस्ता, पिंपरी खुर्द ते ज्योती जुना रस्ता, इंदापूर ते पडस्थळ रोड, नरुटे वस्ती डोंगरे वस्ती, पांढरमिसे वस्ती, पवार वस्ती रस्ता, सुगाव ते आजोती जोड रस्ता, पेटकर वस्ती ते व्यवहारे वस्ती स्मशानभूमी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली.