कराड – महाआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानभवनात अर्थमंत्र्यांनी सादर केला. आज देशात तिहेरी संकट येऊन ठेपले आहे. एक म्हणजे देशाची आर्थिक महामंदी, दुसऱ्या बाजूला सामाजिक अस्थिरता तर तिसरे संकट कोरोना. या पार्श्वभूमीवर सुद्धा महाआघाडी सरकारने राज्यातील सर्व विभागांना न्याय देणाचा पूर्ण प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
ते म्हणाले, आज महाआघाडी सरकार 100 दिवस पूर्ण करीत असतानाच राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. राज्यावर अतिशय बिकट परिस्थिती असतानाही राज्य सरकारने सर्व विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी सौर उर्जेची संकल्पना, शेतकरी कर्जमाफी योजना, नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम, सिंचन प्रकल्प, कोकणचा सागरी महामार्ग, परिवहन मंडळामध्ये मुलभूत बदल, स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य, शिक्षणामध्ये – प्रत्येक तालुक्यात किमान 4 आदर्श शाळा घडविणे अशा सर्व विभागांना न्याय देणाचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेला आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल अशी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.