लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्राम्हण समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पक्षातर्फे अयोध्येत 23 जुलै रोजी ब्राम्हण संमेलन आयोजित केले आहे.
त्या म्हणाल्या की ब्राम्हण समाजाने गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाला मतदान केले पण त्यांचा भ्रमनिरास झाला असून आता हा समाज पुन्हा बहुजन समाज पक्षाकडे वळणार आहे. ब्राम्हण समाजाचे हित बहुजन समाज पक्षच सांभाळू शकतो हे या समाजाच्या लक्षात आले आहे.
कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी ब्राम्हण समाजाला फसवण्याचेच काम केले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. हे या समाजाला पटवून देण्यासाठी आणि या समाजाशी पक्षाची नाळ पुन्हा जोडण्यासाठी बहुजन समाज पक्षाने पुन्हा प्रयत्न हाती घेतले आहेत.
खासदार सतिश मिश्रा यांच्या नेतृत्वाकाली त्यासाठीच 23 जुलैरोजी अयोध्येत ब्राम्हण संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही मायावती यांनी आज दिली.