नाशिक – “चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 करोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहेत.
या शाळा सुरू करताना शिक्षण व आरोग्य विभागाने गावपातळीवर समन्वयाने नियोजन करून राज्य शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार करोनामुक्त गावांत आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत, तेथे शिक्षण व आरोग्य विभाग तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण विभागाने शाळा सुरू होणार असलेल्या शाळांतील शिक्षकांची आरटीपीआर तपासणी करून घ्यावी.
नाशिक जिल्ह्यातील करोनामुक्त 335 गावांतील शाळांमध्ये साधारण एक लाख 31 हजार 159 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 42 हजार 840 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती कळविली आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.