हैदराबाद – तेलंगणातील कालच्या प्रचंड सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बीआरएसवर घणाघाती हल्ला केला होता. बीआरएस ही भाजप रिश्तेदार पार्टी आहे असेही विधान त्यांनी केले होते. त्याचा बीआरएस पक्षाने आज प्रतिवाद केला. तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव म्हणाले की बीआरएस ही कोणाची ‘बी टीम’ नाही. बीआरएस ही गरीबांची ए टीम आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचा मुकाबला करण्यास कॉंग्रेसच असमर्थ ठरली असून “भाजपच्या तावडीतून” देशाचे रक्षण करण्यासाठीच बीआरएसचा जन्म झाला आहे असे ते म्हणाले.
कॉंग्रेस हा भ्रष्टाचाराचा समानार्थी शब्द झाला आहे. त्यामुळे लोकांनी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर केले असे ते म्हणाले. एका निवेदनात त्यांनी कॉंग्रेसला उद्देशून म्हटले आहे की, “तुमच्या पक्षाचे नावच ‘घोटाळेबाज पक्ष’ असे झाले आहे.कालेश्वरम प्रकल्पात एक लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे हा एक विनोद आहे कारण या प्रकल्पाची एकूण किंमत 80,321.57 कोटी रुपये आहे, असे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुतणे हरीश राव यांनी सांगितले.
भूमिहीन गरीबांसाठी जमीन या आंदोलनाचा भाग म्हणून डाव्या पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या वेळी अविभाजित आंध्र प्रदेशात 2007 मध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना खम्मममध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देताना हरीश राव म्हणाले की, त्या भागातील लोकांचा कॉंग्रेसवर कदापिही विश्वास बसणार नाही.