मंचर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गंगापूर खुर्द गावातील गाडेकरवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण-भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आर्यन अरुण काळे (वय 11) आणि त्याची बहीण अंजली अरुण काळे (वय 15) अशी या भावंडांची नावे आहेत. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी (दि. 4) सकाळी करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत आदित्य जाधव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. 3) दोघेही भावंडे गाडेकरवाडी येथे वरसुबाई मंदिराच्या शेजारी ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ते बराच वेळ होऊनही घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता ते ओढ्यात मृतावस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले असता त्यांचा श्वास बंद होता. मंचर येथील रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना गुरुवार (दि. 3) रात्री साडेआठ वाजता घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या बहीण-भावांचा झालेला मृत्यू कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वागज करीत आहेत.