मुंबई – राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासह गटातील सर्व नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेट घेतली. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आज अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आत्राम मेश्राम आणि अदिती तटकरे हे सर्व वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक संपली आहे.
दरम्यान, आजच्या या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, “मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं फडणवीस यावेळी म्हणालेत.
जाणून घ्या, भेटीचं नेमकं कारण….
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल म्हणाले की, “आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. पवार साहेब यांची वेळ न मागता आम्ही संधी साधून त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. राष्ट्रवादी पक्ष एक संघ राहण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली. मात्र यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यांनी येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं अशी आम्ही विनंती केली आहे. परंतु पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं जे मत होतं, विनंती होती ते त्यांनी ऐकून घेतले आणि आता भेटीनंतर आम्ही येथून जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेच अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील’. असं ते देखील यावेळी म्हणाले.