Brahma Kumari Sister : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. आगरा येथील जगनेर येथे ही घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी दोघींनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी आत्महत्येसाठी संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले होते.
सुसाईड नोटमध्ये दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आसारामसारख्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘योगी जी.. आसाराम बापूंसारख्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्या. सुसाईड नोटमध्ये मृत बहिणींनी चारही आरोपींवर पैशांचा अपहार तसेच अनैतिक कृत्ये केल्याचा आरोप केला आहे. एसीपी खैरागढ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आणि शिखा यांनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये दोघीही राहत असे. मृत बहिणींपैकी शिखा (३२) हिने एक पानी सुसाईड नोट लिहिली, तर एकता (३८) हिने दोन पानी सुसाईड नोट लिहिली आहे. शिखाने सुसाईड नोटमध्ये दोन्ही बहिणी गेल्या एक वर्षापासून त्रस्त असल्याचे नमूद केले आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने आश्रमातील नीरज सिंघल, धौलपूरचा ताराचंद, नीरजचे वडील आणि ग्वाल्हेर येथील आश्रमात राहणाऱ्या एका महिलेला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.