- सर्वांनाच “मसल पॉवर’ची गरज
- रुग्णालयापाठोपाठ आता बाजारातही “बॉडी बिल्डर’
पिंपरी – काही वर्षांपूर्वी जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी बिल्डर व्यावसायिक बाऊन्सर नेमत असत. त्यानंतर सेलिब्रेटी असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, हॉटेल्स, पबमध्ये बाऊन्सर्सची इंट्री झाली. परंतु अलिकडे सगळ्याच ठिकाणी बाऊन्सर दिसू लागले आहे. तसेच बाऊन्सर नेमणे म्हणजे प्रतिष्ठचेही लक्षण मानले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातही आता “बाऊन्सर राज’ दिसू लागले आहे. खासगी तर सोडाच परंतु महापालिकेला देखील रुग्णालयामध्ये बाऊन्सरची गरज भासू लागली आहे. त्यापाठोपाठ आता व्यापारी संघटनांनीही पिंपरी कॅम्पमध्ये बाऊन्सर नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी ठारविक ठिकाणी बाऊन्सर दिसत असे. त्यानंतर मोठे हॉटेल, बियर बार, पब याठिकाणी बाऊन्सर नेमण्यात येऊ लागले. अलिकडेच शहरामध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये बाऊन्सर नेमण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्याठिकाणी लोकप्रतिननिधी व डॉक्टर यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. अशाप्रकारचे वाद होऊ नये यासाठी रुग्णालयात बाऊन्सर नेमण्यात आले. त्यानंतर काही बड्या खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णांच्या नातेवाइकांवर धाक ठेवण्यासाठी बाऊन्सर नेमले आहेत.
पिंपरी कॅम्पमधील शगुन चौकात बाऊन्सर नेमण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शगुन चौक ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य बाजारपेठ ते भाटनगरपर्यंतच्या रस्त्यावर फेरीवाले, पथारीधारक बसतात. नगररचना विभागाच्या आराखड्यानुसार येथील रस्ता नऊ मीटरचा आहे. प्रत्यक्षात रस्ता अरुंद आहे.
रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. एकीकडे वाहतूक आणि दुसरीकडे फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्यामुळे याठिकाणी चालण्यासाठी नागरिकांना त्रास होतो. तसेच वाहतूक कोंडीमुळे बाजारपेठेच्या अर्थकारणावरही परिणाम झाला आहे. अवैध फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी याठिकाणी चार बाऊन्सर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुकानांमध्येही बाऊन्सर
पिंपरी कॅम्पमधील काही मोठ्या दुकानदारांनी पहिल्यापासूनच बाऊन्सर नेमले आहेत. तसेच मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही बाऊन्सर नेमलेले आहेत. अलीकडे बहुतांश ठिकाणी बाऊन्सरच्या माध्यमातून सुरक्षा घेण्याकडे व्यापारी, संस्था यांचा कल वाढला आहे. तर कधी नव्हे ते महापालिका प्रशासनानेही बाऊन्सरला पसंती देत रुग्णालयामध्ये बाऊन्सर नेमले आहेत. त्यामुळे आता हळूहळू शहरावर बाऊन्सर राज येऊ लागले आहे.
वाद चिघळण्याचे कारण
बाऊन्सर यांना वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी नियुक्त केले जात नाहीत. तर वाद घालणाऱ्यावर धाक निर्माण करण्यासाठी नेमले जाते. यापूर्वी हिंजवडीमधील अनेक हॉटेल्स आणि क्लबमध्ये बाऊन्सरने ग्राहकांना मारहाण केल्याचे किस्से घडले आहेत. काही घटनांमध्ये पोलिसांना गुन्हे दाखल करावे लागले आहेत. ज्या पद्धतीने आता व्यापारी संघटना आणि मोठे व्यावसायिक बाउन्सर नेमत आहेत, ते पाहता भविष्यात व्यापारी विरुद्ध फेरीवाले, व्यावसायिक विरुद्ध ग्राहक असे वाद चिघळण्याचे कारणही बाऊन्सर ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तरुणांना संधी
अनेक तरूणांचा शरीरयष्ठी बनविण्याकडे कल असतो. त्यासाठी जिममध्ये व्यायाम केला जातो. अनेक तरूण शरीरयष्ठी चांगली बनविण्यासाठी मेहनत घेत असतात. बाऊन्सरसाठी अशा शरीरयष्ठी चांगली असलेल्या तरुणांना घेतले जाते. त्यामुळे या बाऊन्सर राजचा फायदा अशा बॉडी बिल्डरांना होणार आहे. परंतु यासोबतच विनाकारण वादात अडकल्याने दाखल होणाऱ्या पोलीस गुन्ह्यांमुळे त्यांचे करियर खराब होऊ शकते. कारण बाऊन्सर हे संपूर्ण आयुष्यभरासाठीचे करियर असू शकत नाही. वय वाढल्यानंतर हे क्षेत्र सोडावे लागते, दरम्यान जर गुन्हे दाखल झालेले असतील आणि शिक्षा झाली असेल, तर इतर नोकरी-व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात.