पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी शाळांमध्ये दोन महिन्यांत 53 हजार मुलांचे प्रवेश निश्चित झाले. अद्यापही प्रवेशाच्या 62 हजार जागा रिक्त आहेत. प्रवेशासाठी आता 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
“आरटीई’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. दरवर्षी या प्रवेशासाठी पालकांमध्ये स्पर्धा लागते. यंदा मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे.
राज्यात 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 460 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाइन अर्ज दाखल झाले. 17 मार्च रोजी राज्यस्तरीय प्रवेशाची लॉटरी निघाली. यात 1 लाख 926 विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली. लॉटरीद्वारे निवड झालेल्यांना प्रवेश निश्चित करण्याबाबत “एसएमएस’ पाठवले आहेत. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये. जाताना बालकांना सोबत नेऊ नये, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. आतापर्यंत 54 हजार पालकांनी आपल्या मुलांचे शाळांमध्ये तात्पुरते प्रवेश घेतले. त्यातील 53 हजार मुलांचे प्रवेश निश्चितही झाले. 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी मुदत होती. ती वाढवली आहे.
प्रतिक्षा यादीत 75 हजार 465 मुलांचा समावेश आहे. या पालकांनी प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना पोर्टलवर नंतर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.