पिंपरी -पेपरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने स्टेशनरीचे भाव देखील वधारले आहेत. त्यामुळे वह्या, पुस्तके तसेच इतर स्टेशनरीच्या किंमती 15 ते 20 टक्यांनी वाढल्या आहेत. शाळा सुरू होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे शालेय साहित्याची चौकशी करण्यासाठी पालकांची पिंपरी कॅम्पमधील बाजारात गर्दी होत आहे. मात्र, वह्या पुस्तकांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. तर यामुळे होलसेल व्यापारीही धास्तावले आहेत.
गेले दोन वर्ष करोनामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिकवणी सुरू होती. त्यामुळे वह्यांच्या मागणीमध्ये घट झाली होती. मात्र, यंदा शाळांबाबतचे निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कंपन्यांसोबतच व्यापाऱ्यांनाही चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे. मात्र, स्टेशनरींच्या किंमतीमध्ये 15 ते 20 टक्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे यंदा पालकांना वह्या पुस्तकांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या वर्षी पाचशे रुपये डझन या दराने बड्या कंपन्यांच्या मोठ्या आकाराच्या वह्या विद्यार्थ्यांना मिळत होत्या. मात्र यावर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे. ब्रॅंडेड कंपन्यांच्या वह्या 700 रुपये डझनपर्यंत पोहचल्या आहेत. तर साध्या वह्या 520 ते 570 रुपये डझनपर्यंत मिळत आहे. छोट्या आकाराच्या वह्यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली असून या वह्या 350 ते 400 रुपये डझनपर्यंत पोहचल्या आहेत. याव्यतिरिक्त पुस्तके, प्रयोगवही, अपेक्षित संच, प्रश्नोत्तर संच यांच्या किंमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
याबाबत बोलताना पिंपरी कॅम्पमधील विक्रेते राकेश चव्हाण म्हणाले, मोठ्या कंपन्यांकडून 12 ते 18 टक्के जीएसटी लावून मालाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे माल घेतानाच जास्त पैसे मोजावे लागतात. तर दुसरीकडे पेपरच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी वह्या, पुस्तकांच्या किंमतीत देखील वाढ केली आहे. त्यामुळे खरेदी करतानाच अर्थिक भार सोसावा लागत आहे. तर येत्या काळात आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्टेशनरीच्या मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे.
दोन वर्ष वह्या काही प्रमाणात कमी घ्याव्या लागत होत्या. तसेच किंमत देखील कमी होती. यावर्षी वह्यांच्या किंमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. तर शाळांकडून देखील एका विषयासाठी दोन-दोन वह्या घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालकांना यंदा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
– किरण शिंदे, पालक