सातारा – सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्यावतीने 21 व्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या मैदानावर उद्या, दि. 3 ते 6 या कालावधीत होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता होणार आहे. ग्रंथ महोत्सवात परिसंवाद, कवी संमेलन आदी साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.
महोत्सवासाठी उभारलेल्या मंडपाला कर्मवीर भाऊराव पाटीलनगरी, असे नाव देण्यात आले आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी पूजन होणार आहे. त्यानंतर दिंडी चित्ररथांसह कर्मवीरनगरीकडे मार्गस्थ होणार आहे.
ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन 11 वाजता ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, कार्यकारिणी सदस्य डॉ राजेंद्र माने, सुनिता कदम, नंदा जाधव, संतोष लाड उपस्थित राहणार आहेत.
“मला समजलेले कर्मवीरअण्णा’ या विषयावर दुपारी तीन वाजता प्रा. जगन्नाथ देसाई यांचे व्याख्यान होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील अध्यक्षस्थानी आहेत. डॉ. मंदार दातार, उमेश झिरपे, डॉ. संदीप श्रोत्री व एव्हरेस्टवीर आशिष माने यांचा सहभाग असलेला “खाद्य वनस्पतींचा इतिहास’ हा कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता होणार आहे. “पर्यटन साहस व सुरक्षितता’ हा कार्यक्रम सायंकाळी सव्वापाच वाजता होणार आहे. प्रा. राजेंद्र मिस्त्री (कोल्हापूर) यांचा “नाद सूरमयी’ हा कार्यक्रम सात वाजता होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.