मुंबई – मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात जाण्याचे आदेश दिले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मूळ खंडपीठाने नकार दिला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केले. काही कारणास्तव या याचिकेवरील सुनावणीस न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात दाद मागावी लागणार आहे.
जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी २० जानेवारीपासून जरांगे यांनी आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी काढली आहे. याच पायी दिंडीचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, याच मुंबई आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला होता. परंतु, जरांगे आपल्या मुंबई आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार आणि मराठा आरक्षण घेऊनच येणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, सरकारला आता आम्ही एक तास देखील वाढवून देणार नसल्याचे सुद्धा जरांगे म्हणाले आहेत.