मुंबई :‘भारत जोडो’ यात्रेमुळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या या धमकीमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात एका पत्राद्वारे राहुल गांधींना धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आले आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत.
दरम्यान पोलिसांनी हा खोडसाळ प्रकार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण तरीही पोलीस सर्व काळजी घेत असून तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. तर इकडे महाराष्ट्रात राहुल गांधी यांची शेगाव मधील सभा उधळून लावणार असल्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर सभास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.