बॉलीवूड म्हणजे सगळं आयुष्य होत नाही. माझ्यासाठी बॉलीवूड हा केवळ एक भाग आहे, असे अभिनेत्री गुल पनागने म्हटले आहे. बॉलीवूडमधला आतापर्यंतचा प्रवास खूपच छान होता असे तिने सांगितले. गुल् पनागने 1999 साली “मिस इंडिया’ किताब जिंकला आणि त्यानंतर “मिस युनिव्हर्स’ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने आतापर्यंत “डोर’, “धूप’, “मनोरमा’, “सिक्स फीट अंडर’ आणि “अब तक 56 -2’सारख्या सिनेमांमधून काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ती बॉलीवूडमध्ये सक्रीय नाही. पण आतापर्यंतचा प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा राहिला असल्याचे तिने सांगितले. बॉलीवूडबद्दल आपल्याला अजिबात तक्रार नसल्याचेही तिने आवर्जून सांगितले.
बॉलीवूडमधील ऍक्टिंग आणि मॉडेलिंग शिवाय गुल पनागने ऍथलिट आणि पायलट म्हणूनही आपली हौस भागवली आहे. तिला मोटारसायकली भन्नाट पळवण्यातही मजा वाटते. फिटनेसची विशेष काळजी घेणारी गुल पनागने 2017 साली हेल्थ आणि फिटनेस स्टार्ट देखील सुरु केले. आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यात ताळमेळ राखण्यात यश आल्याने अपेक्षाभंगाचे दुःख झाले नसल्याचे ती म्हणते. जेव्हा संधी मिळत होती, तेव्हा आनंदाने स्वीकारली आणि संधी मिळत नाही, असे लक्षात आल्यावर दूर राहणे तिने पसंत केले. ती सध्या “द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिझनसाठी काम करते आहे. याशिवाय नितीन मुकेशबरोबर “बायपास रोड’ हा सिनेमाही करते आहे. “रंगबाज’च्या सीजन टू मध्ये जिमी शेरगिल बरोबर असेल.