नवी दिल्ली – राजकीय महासंग्राम ठरणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरी जाण्यासाठी भाजपची रणनीती जवळपास तयार झाली आहे. तिची झलक मंगळवारी भाजपच्या बैठकीतून दिसली. त्यातून कुठल्या मतदारांपर्यंत पोहचायचे, प्रचाराची दिशा कशी असावी याचा आराखडा त्या पक्षाने निश्चित केल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीला ३०० हून अधिक नेते उपस्थित होते. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मार्गदर्शन केले. नवमतदार, सरकारी योजनांचे लाभार्थी, ओबीसी, एससी, एसटी, तरूण आणि महिला यांसारख्या मतदारांच्या विविध घटकांपर्यंत पोहचण्याचा भाजपचा संकल्प आहे.
त्यातूनच गावांकडे चला अशा स्वरूपाची मोहीमही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हाती घेणार आहेत. मुख्य राष्ट्रवादी प्रवाहाचा भाग बनू इच्छिणाऱ्यांना समवेत घेण्याचा इरादा बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे इतर पक्षांमधील नेत्यांचे स्वागत करण्यास भाजप राजी असल्याचे स्पष्ट झाले.
शहा यांनी बैठकीत बोलताना प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली कामगिरी अधोरेखित केली. गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने पाऊले उचलली. भारताला महाशक्ती बनवण्याचे उद्दिष्ट समोर कार्य केले जात आहे. जगभरात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे, असे त्यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी केल्याने भाजपचा उत्साह दुणावला आहे. अशात राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे भाजपसाठी वातावरण आणखीच अनुकूल बनले आहे. त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करण्याची चांगली संधी असल्याची भावना त्या पक्षातून व्यक्त केली जात आहे.