Omar Abdullah On BJP’s manifesto – भाजपचा जाहीरनामा जम्मू काश्मीरसाठी नेहमीच विनाशकारीच असतो अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सनचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. आज ते एएनआयशी बोलत होते.
ते म्हणाले की, मी सकाळपासून प्रचारात व्यस्त आहे. मी अद्याप त्यांचा जाहीरनामा वाचलेला नाही. पण मला जी माहिती मिळाली त्यावरून त्यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरसाठी काहीही नाही. भाजपचा जाहीरनामा नेहमीच जम्मू काश्मीरवर अन्याय करणारा असतो. या राज्याच्या पाचही लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच जिंकेल असेही त्यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीत झालेल्या जागावाटपानुसार काँग्रेस जम्मू, उधमपूर आणि लडाख लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल, तर नॅशनल कॉन्फरन्स अनंतनाग-राजौरी, श्रीनगर आणि बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल.
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही अजूनही कलम ३७० च्या पुनर्स्थापनेची आशा सोडलेली नाही. द्रमुक तृणमुल कॉंग्रेस सारखे अनेक समविचारी पक्ष आहेत, जे कलम ३७० वर आमच्यासोबत आहेत. लोकसभेच्या फक्त 2 जागा असताना भाजपने आशा सोडली नव्हती मग आपण का सोडावी असा सवाल त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या पाच टप्प्यात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान होणार आहे.